|
पुर्वेतिहास |
| |
परमार्थाचे बाळकडु नाथांनी आपल्या ज्या पूर्वजांकडून
घेवून त्यासं व्यापकत्व प्राप्त करुन दिले त्या
पूर्वजांचा इतिहासही तेवढाच दैदीप्यमान आहे. महाराष्ट्रातील पंढरपुरात श्रीविठ्ठलाचं दर्शन
आपण घेत आहोत त्याचं सर्व श्रेय जातं ते नाथांचे
पणजोबा श्रीसंत भानुदासमहाराज यांना.
श्रीभानुदासांचा जन्म इ.स. १४४८ साली देशस्थ ऋग्वेदी
ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच सूर्यनारायणाची
उपासना करुन त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त
केले होते.
नाथ म्हणतात - ज्याने बाळपणी आकळिला भानु । स्वये
जाहला चिद्भानु । जिंकोनी मानाभिमानु । भगवत्पावनु
स्वये जाला ॥
प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार
सुरु केला, व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी
पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. कारण तो त्यांच्या
कुळाचा नेम होता. |
भानुदास महाराज म्हणतात - आमुचिये कुळी पंढरीचा
नेम । वाचे सदा नाम विठ्ठलाचे ॥
भानुदासांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेने,
विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस
आला. श्रीविठ्ठलास आपल्या राज्यात नेवून प्रतिष्ठीत
करावे असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसे
केले. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्रीविठ्ठल
दर्शनार्थ जमू लागले. परंतु ज्याच्या दर्शनासाठी
आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचे पाहुन वारकरी
आलाप करु लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना
आश्वासन दिलं कि, "मी विठ्ठलास परत" येथे आणीन!
भानुदास निघाले, काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या
सुमारास विठ्ठलासमोर येवून उभे राहिले. देवास म्हणाले,
"देवा सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत चल
माझ्याबरोबर!" |
विठ्ठलानं आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा
हार भानुदासांच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्याचा
सल्ला दिला. भानुदास तेथुन |
|
 |
|
बाहेर पडले. पहाटे काकड
आरतीच्यावेळी जेव्हां पुजारी तेथे आले तेव्हां
त्यांच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यात नवरत्नांचा
हार नाही. राजापर्यंत बातमी पोचली. जो कोणी चोर असेल
त्यास परस्पर सुळवर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले.
सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्यावेळी तुंगभद्रा
नदीच्या किनारी भानुदास संध्या करित असताना एका
सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला.
हाच चोर असावा असं गृहीत धरुन सैनिकाने भानुदासांस
बंदि बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय
घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातुन अभंग
प्रकटला - जै आकाश वर पडो पाहे । ब्रह्मगोळ भंगा जाये
। वडवानळं त्रिभूवन खाये । तरी तुझीच वाट पाहे गां
विठोबा ॥
ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार त्या सुळास
पालवी फुटली. सदर प्रसंगाचं वर्णन त्यांच्याच भाषेत
पहायचं झाल्यास - कोरडिये काष्ठी अंकुर फुटले । येणे येथे जाले विठोबाचे
॥ |
ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाचा थरकांप उडाला,
ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्भक्त
असावा हे त्याच्या लक्षात आले. माझ्या भक्ताचा
छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा
विठ्ठलानं दिला. भानुदास विठ्ठलाला घेवून पंढरीस
निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी
श्रीविठ्ठलाची रथावरुन मिरवणूक काढली तो दिवस होता
कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. (आजही कार्तिकी
एकादशीस रथोत्सव होतो तो या दिवसाचं स्मरण म्हणुन.)
भानुदासांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.
श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या
हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती
म्हणजे श्रीभानुदास महाराजांची समाधी होय. आजही
त्यांच्या समाधीदिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये
साजरा करण्यात येतो. ह्या दिवशी त्यांच्या वंशजांकडुन
परंपरेनं प्रतिवर्षी समाधीचे पूजन, नैवेद्य किर्तनादी
करण्यात येते.
संत श्रीभानुदासांच्या भक्तितून अंशत:उतराई होण्यासाठी
विठ्ठलानं त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संतएकनाथमहाराजांच्या
रुपात.
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार ।
क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरीतीर ॥ निळोबा
महाराज |
| |
| |
|
| |